मेहंदीच्या पानावर

Post Reply
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

मेहंदीच्या पानावर

Post by rangila »

मेहंदीच्या पानावर


२४ डिसेंबर
आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील. अर्थात मला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या सहा महीन्याची माझ्या डायरीची पानं तुम्ही चाळलीत तरी तुमच्या आपसुकच लक्षात येईल.
त्याला अचानकपणे येताना पहाताच खरं सांगु तर माझा माझ्यावरच ताबा राहीला नाही आणि नकळतच मी आशुचा हात इतका जोराने दाबला होता की न रहावुन ती ओरडलीच.
मी म्हणलं आशुला, ‘स्वॉरी यार, उन्हाने तापलेल्या धर्तीवर, पाना-फुलांवर पावसाचा एक थेंब पडला तरी सगळे कसे झुमुन उठतात इथे तर माझ्यावर साक्षात एक सर कोसळली होती..’
तर म्हणते कशी, ‘अदिती.. बास आता.. राज तुला किती आवडतो हे मलाच काय पुर्ण स्टुडीओ ला माहीत झालंय..’
‘म्हणजे??? मी इतकी ऑब्व्हीयस वागते की काय?‘
‘तो समोर आला कि तुझा चेहरा बघ कित्ती बदलतो. लाजतेस काय, एकटीच हसतेस काय, पायाच्या अंगठ्याने जमीनीवर लिहीतेस काय..’
आशु बोलत होती, माझ्या मनात मात्र ते गीत गुणगणत होते.. ‘लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी, मनात हसली, मनात रुसली, खुदकन हसली ती फुलराणी’
‘काय बोलते आहेस तु आशु? अगं मग हे आधी नाही का सांगायचं? राजला तर नसेल ना हे कळलं? काय म्हणेल तो? एक फडतुस गाण्यामध्ये ‘कोरस’ आवाज देणारी अदिती.. माझ्यावर प्रेम करते..!! हसला असेल तो स्वतःशीच.. शट्ट यार..’
तर म्हणते कशी..’अगं काही हसतं वगैरे नाही.. त्याला सवय आहे अश्या गोष्टींची.. तु एकटी का आहेस त्याच्यावर प्रेम करणारी..’ खरंच सांगते इतका राग आला होता ना असतील हजारो प्रेम करण्याऱ्या, पण माझ्याइतके नक्कीच नाही.
‘हाय आशु.. हाय अदिती..’ राज अचानक कुठुनतरी समोर आला. इतका हॅन्ड्सम दिसत होता ना.. माझं नाव त्याला माहीत आहे हे कळल्यावर तर इतका आनंद झाला ना.. मला काही बोलताच येईना.. शब्दच अडकले.. मग आशुच म्हणाली.. ‘हॅलो राज..’
‘शी कित्ती मुर्ख आहे ना मी.. कित्ती बावळट दिसले असेन?’
‘उद्या संध्याकाळी माझ्या घरी यायचं..सगळ्यांनाच बोलावले आहे.. तुम्ही सुध्दा या. क्रिसमस निमीत्त पार्टी ठेवली आहे, ८.३० वाजता, नक्की या’ एवढे बोलुन गेला सुध्दा.
‘मला खुप काही बोलायचे होते. त्याला सांगायचे होते.. त्याचा आवाज खुप आवडतो मला.. त्याच्याबरोबर एक-दोन गाणी सुध्दा मी गायली आहेत.. पण कध्धी.. माझ्या तोंडातुन तर हॅलो सुध्दा नाही फुटले.. खरचं अदिती बिनडोक आहेस तु..’
ख्रिसमसच्या आधी किंवा ख्रिसमसला बर्फ पडणे शुभ मानतात.. माझ्या अंगावर तर आज थंडगार बर्फाची एक कोमल, शितल चादरच लपेटल्यासारखे वाटले.. आज पहिल्यांदा राज माझ्या इतक्या जवळ होता.. शुभ-शकुनच म्हणायचा..
२५ डिसेंबर
केवढी धांदल उडाली होती माझी सकाळी उठल्यापासुन. काय करु आणि काय नाही असं झालं होतं. सकाळ्ळीच पार्लर मध्ये जाऊन आले, दहा वेळा कपाट उपसुन एकदाचा ड्रेस फायनल केला. शंभरवेळा आरश्यासमोर उभे राहुन स्वतःला न्याहाळले, केसांचे तर नानाविवीध प्रकार करुन पाहीले पण एक पसंत पडेल तर शप्पथ. गरज असली ना की हे बरोब्बर धोका देतात आपल्याला.
दिवस कसाबसा सरला, पण संध्याकाळ संपता संपेना. आशु न्यायला येणार होती त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. मॅडम नेहमीप्रमाणे उशीराच आल्या. मी माझा सर्वात आवडता पांढरा घागरा घातला होता. आशुने आज मनापासुन कॉम्लीमेंट दिले. छान वाटलं. ‘राज’च्या बंगल्यावर पोहोचलो. दिव्यांच्या झगमगाटाने बंगला उजळुन निघाला होता. राजच्या शब्दाला मान देऊन कित्तेक लोकं त्याच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. राज आहेच तसा, सगळ्यांना ‘आपला’ वाटणारा.
आशु तर मागेच लागली होती.. अदिती तु आज बोलच राजशी. त्याला नक्की माहीती असणार तुला तो आवडतो ते. आणि तुझ्यात तरी काय कमी आहे गं? तुला नाही म्हणुच शकणार नाही तो.
खरंच आशु.. असं झालं तर? पण माझे शब्दच खुंणतात गं तो समोर आला की. आपलेच शब्द आपल्याला अनोळखी होतात..
राजने स्वतः होऊन आमची भेट घेतली, आम्हाला काय हवं काय नको ते बघीतले. खुप ‘केअरींग’ आहे तो. तो समोर असला ना, म्हणजे मला एखादी छोटी मुलगी झाल्यासारखं वाटतं. त्याच्यासमोर आपणं खुपच छोटे, क्षुल्लक असल्याची भावना मनामध्ये प्रबळ होते. असं वाटतं.. स्वतःला त्याच्या घट्ट मिठीमध्ये झोकुन द्याव!
मनामध्ये विचारांचा गोंधळ उडाला होता. आशु म्हणते तसं खरंच बोलावं का त्याच्याशी. कित्ती दिवस हे असे नुसते बघुन उसासे घेत बसणार? करावं का त्याच्याजवळं आपलं मन मोकळं? पण वाईट तर नाहीना दिसणार? काय म्हणेल तो? मला तर तो फारसं ओळखतही नसेल. असे कित्तीसे बोललो आपण एकत्र?
इतक्यात टाळ्यांचा कडकडाट झाला तशी माझी तंद्री भंगली. समोर उभारलेल्या एका उंचवट्यावर राज उभा होता. त्याने पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत केले. ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. तो बोलत होता.. पण मनावर कसलेतरी दडपण येत होते… कसले?? नाही सांगता येत.. कदाचीत मगाचपासुन त्याच्याबरोबर असणाऱ्या त्या ‘निधी मेहता’ मुळे. सतत ती राजच्या बरोबर होती. म्हणे सुप्रसिध्द गायीका. कसली सुप्रसिध्द.. एक दोन किंचाळणाऱ्या आवाजातली आयटम-सॉग्स सोडली तर एक हिट गाणं नाही तिच्या नावावर.
राजने तिला जवळ बोलावले आणि.. आणि…
सर्व जग डोळ्यासमोर गोल फिरत होते.. विश्वास बसत नव्हता काही क्षणांपुर्वी माझ्या राजची.. त्या निधीशी ऐंन्गेजमेंट झाली होती. एकमेकांना त्यांनी अंगठ्या घातल्या होत्या.. काय झालं हे.. कसं झालं.. गर्दीपासुन दुरवर एकटीच हातामध्ये ऑरेंज ज्युस घेउन उभी होते. डोळ्यातुन ओघळणारे खारटं पाणी त्यामध्ये पडुन त्या ज्युस मधील गोडवाच जणु गेला होता.
आशु शोधत शोधत माझ्यामागे येऊन उभी राहीली. आम्ही दोघीही गप्प होतो..पण आमचा मुक संवाद दोघींनाही कळत होता.. आशु म्हणत होती.. असे एकटे राहुन काय होणार.. चल राजला शुभेच्छा दे त्याच्या भावी आयुष्यासाठी.. हा एकटेपणा आत्ताच दुर कर नाहीतर तो तुझ्या सोबतीला राहील कायमचा..
मी मात्र म्हणत होते..
“आहेच मी जरा तशी
एकटी एकटी राहणारी
वाळकं पान सुध्दा गळताना
तन्मयतेने पाहणारी..”
[क्रमशः]



User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: मेहंदीच्या पानावर

Post by rangila »


2
२८ डिसेंबर
दोन दिवस मी घरीच बसुन होते. कुठे जाण्याचा मुडच नव्हता. २६ च्या पेपरमध्ये राज च्या ऐंन्गेजमेंटबद्दल बातम्या झळकुन गेल्या.
त्या दिवशीचे अनेक लोकांचे चेहरे मला अजुनही आठवत होते. आशु म्हणाली होती ते खरंच होतं. माझ वागणं इतक ऑब्व्हियस होतं की सगळ्यांनाच राज बद्दल मला वाटणारे आकर्षण, प्रेम माहीती झाले होते. माझ्या चेहऱ्यावर कोसळलेल्या दुःखाचे कुणाला खरंच वाईट वाटले तर कुणाला फिदीफिदि हसायला कारणंच मिळाले. कुणी सहानभुती दाखवली तर कुणी आडुन-आडुन का होईना थट्टा करुन घेतली. आता हा विषय निदान काही आठवडे तरी चघळला जाणार यात काहीच शंका नव्हती.
सकाळी रेकॉर्डींग होते, पण काही केल्या आवाजच लागेना. शेवटी मला वगळुन रेकॉर्डिंग केले गेले. खुप वाईट वाटले. पण त्यांचाही नाईलाजच होता ना.
“एका ओसाड माळरानावर, माझं मन उदास पडलेलं,
तिथंसुध्दा वेडं, तुझ्याच आठवणीत बुडलेलं..”

३१ डिसेंबर
कसलं नविन वर्षाचं स्वागत आणि कसलं काय. ग्रहाणलेल्या चंद्राची कोणी कोजागीरी पोर्णीमा करते काय? आई-बाबांच्या चेहऱ्यावर माझ्या वागण्यातील अचानक बदलाचे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर माझ्याकडे सुध्दा नाहीत. त्यांची नजर टाळण्याचा खुप प्रयत्न करते आहे.. पण कुठवर?
मन दुःखी असले की कसं सगळं जगच दुःखात बुडालेले वाटते. मागच्या अंगणात सुगंधाचा सडा घालणारा प्राजक्त सुध्दा सध्या मला दुःखीच वाटायला लागला आहे..
“प्राजक्तासारखी माझी सुध्दा स्वप्न पहाटेला गळतात,
म्हणूनच प्राजक्ताची दुःखं कदाचित, मला कळतात..”
आशुचे दोन मिस्ड कॉल्स दिसले नंतर मात्र परत तिने फोन केला नाही. कदाचीत माझं एकटं रहाणं तिनेसुध्दा स्विकारलेले दिसते आहे.

८ जानेवारी
जुलै मध्ये ज्या चित्रपटासाठी गाणी गायली होती त्याचे म्युझीक लॉच होते. आशुच्या आग्रहाखातर गेले होते. त्या झगमगाटात, आनंदाच्या वातावरणात माझं मन काही केल्या रमेना. खुप प्रयत्न केला झालं गेले विसरुन जाण्याचा. कदाचीत चुक माझी होती. एक तर मी अशक्याची अपेक्षा केली होती आणी केलीच होती तर त्यासाठी काहितरी करायला हवे होते. सर्व गोष्टी बसल्या जागी थोडे ना मिळतात?
आजच्या म्युझीक लॉंचला मिडीया कव्हरेज खुप मिळाले, अल्बम हिट होणार यात शंका नाही. सगळेच जणं खुप खुश होते.. माझ्याशिवाय..
“रातराणीच्या सुगंधात चाफ्याचा गंध होता, चांदण्यांच्या चमचमाटात आज चंद्र मात्र मंद होता”
मनाची खुप घालमेल चालु होती. काय करावं. कसं लोकांच्या नजरेला तोंड द्यावं? माझी काहीच चुक नव्हती मग लोकांनी माझ्या वैयक्तीक आयुष्याची अशी थट्टा का मांडावी? एकदा वाटत होतं सरळ बोलुन मन मोकळं करुन टाकावं, तर दुसऱ्याच क्षणी हे चर्चेला अधीक खतपाणी घालण्यासारखे होईल असे वाटुन गप्प बसत होते. स्वतःच घेत असलेला निर्णय कधी आपला तर कधी दुसऱ्याचा वाटत होता. मनाच्या ह्या खेचाखेचीमध्ये माझी मात्र दमछाक होतं होती.

२३ जानेवारी
सिमल्याच्या गोपाळ काकांच पत्र आले. त्यांची तब्बते सध्या खराबच आहे. त्यांचे सिमल्याचे रिसॉर्ट चालवायला मदतीसाठी येतेस का विचारत होते. रेकॉर्डींगचे आणि माझे तसेही जरा बिनसलेच होते. मग मात्र पक्का निर्णय घेतला. इथुन मागे फिरुन पहाणे नाही. हा घेतलेला निर्णयाचा फेरविचार नाही. बाहेर पडले तर मन रमेल कदाचीत म्हणुन लग्गेच होकार कळवुन टाकला.
स्वतःपासुन दुर पळण्याचा एक व्यर्थ प्रयत्न करुन बघायचा, अजुन काय!!

४ फेब्रुवारी
गोपाळकाकांना होकार कळवला आणि आज सकाळी सिमल्यामध्ये मी आले सुध्दा. घेतलेला निर्णय योग्य ठरतो आहे की काय असे वाटावे इतपत इथे आल्यावर छान वाटते आहे. हवे मध्ये एक छान गारवा आहे. दुर डोंगरांवर चमकणारे बर्फाचे कडे आणि हिमालयाचे दर्शन सुखावते आहे. सर्वांपासुन दुर, महाकाय हिमालयाच्या कुशीमध्ये स्वतःला हरवुन घेण्यात खुप मज्जा आहे. असं वाटतं आहे इथुन बाहेर पडुच नये, इथेच लपुन रहावं. पर्वतांच्या या बलाढ्य बाहुपाशात अस्संच स्वतःला झोकुन द्यावं.
काकांचा रिसॉर्ट खुप्पच छान आहे. छोट्टीशी टुमदार ८ बंगल्यांची रांग, कडेला रंगेबीरंगी फुलांचे असंख्य ताटवे, एका बाजुला खोल-खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजुला अंगावर येणारे उंचच उंच पर्वत. काकांनी सगळी सिस्टीम मला समजावुन सांगीतली.
खुप दिवसांनी खुप फ्रेश वाटले आज. इथले चेहरे आपले नसुनही जवळचे वाटत होते. कुणाच्याच चेहऱ्यावर काही प्रश्न नव्हते? माझ्याबद्दल, माझ्या असण्याबद्दल कुणालाच काही घेणे-देणे नव्हते. मी असुनही नसलेलीच होते. माझ्या मनाचे दरवाजेही सर्वांसाठी बंदच होते. आपण बरे, आपले काम बरे म्हणुन दिवस ढकलत होते.. ढकलायचे होते.

१४ फेब्रुवारी
आज १४ फेब्रुवारी, ‘व्हॅलेंटाईन्स डे’. हिमालयाच्या ह्या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभुमीवर आज अनेक प्रेमीकांचे रंग फुलले होते.
“विश्वव्यापी पवन मित्रा, मी मदत मागते आहे,
सांग जाऊनी माझ्या सख्याला, मी वाट पाहात आहे.”
श्शी, हे काय भलतंच लिहीले गेले माझ्या हातुन म्हणुन मी त्या दोन रेघा खोडुन टाकल्या खऱ्या परंतु माझं मन नकळतंच राजच्या आठवणीत अजुनही बुडाले आहे हे तितकेच अधोरेखीत झाले हे मात्र खरं.

“सहवास तुझा जरासा, वेड लावुनी गेला,
दूर होताच तुझ्यापासून, हुंदका भरून आला.”
वाईट्ट आहेस तु राज, खुप वाईट्ट आहेस, आज समोर नसुनही, इतक्या दुर असुनही रडवलंस तु मला.. खुप वाईट्ट आहेस तु राज… आय लव्ह यु राज.. आय स्टील लव्ह यु..
“उर भरून आले की, डोळे अश्रु गाळतात,
अश्रु गाळणारे डोळे जरी माझे असले,
तरी अश्रु मात्र तुझेच नाव सांगतात..”
[क्रमशः]



User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: मेहंदीच्या पानावर

Post by rangila »

3
१५ फेब्रुवारी
रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी उराशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले.
आयुष्य काय खेळ खेळत होते माझ्याबरोबर? ज्याला विसरण्यासाठी मी इतक्या दुर निघुन आले तोच पुन्हा माझ्या आयुष्यात डोकावला होता. याला काय म्हणायचे? निव्वळ योगायोग?, एक आयुष्याने केलेली एक क्रुर थट्टा? की आयुष्यात येणाऱ्या एका सुखद सुखाची चाहुल?
काहीही असो, मला त्याच्या समोर जाणं भाग होतं आणि मी गेले. मला पाहुन तो चकीतच झाला. मस्त हसला मला बघीतल्यावर. कालच रात्री आला. तो आणि ‘निधी मेहता’ दोघं निघाले होते काश्मीरला, पण तिकडे काहीतरी भानगड झाली म्हणुन दिल्लीपासुनच रस्ता बदलला आणि इकडे आले. असो.. मनातल्या मनात एका विचाराने मी खुप खुश होते.. ‘राज’ ने दोन रुम्स घेतल्या होत्या.. वेगवेगळ्या त्याच्यासाठी आणि निधीसाठी.
का कुणास ठाऊक, पण त्याने माझी आणि निधीची ओळख करुन दिली नाही. निधी दिसायला तशी छानच आहे.. हो माझ्यापेक्षाही छान, राजला शोभुन दिसते.. पण स्वभावाने मात्र आज्जीब्बात आवडत नाही मला ती..
राजशी बोलावेसे खुप वाटत होते, पण काय आणि कसं बोलणार? कोणं म्हणुन बोलणार?
संध्याकाळी दिसले होते दोघं..बाहेर जाताना.. निधीचे अगदी राजचा हात हातात धरुन, खांद्यावर डोके ठेवुन चालणं..लाडे-लाडे बोलणं फारचं वाटलं मला… वाटलं जाऊन सांगावं तिला.. ‘ए बये..जरा लांबुन, नवरा नाही झाला तुझा तो अजुन’. पण..
रात्री परतायला पण खुप उशीर झाला असावा त्यांना. मी खुप वेळ वाट बघत थांबले होते. पार्किंग मध्ये कुठल्याही गाडीचा आवाज आला तरी धावत जाऊन खिडकीतुन खाली बघत होते.. उगाचच.. खुर्चीत बसल्या बसल्याच कधीतरी डोळा लागला रात्री

१६ फेब्रुवारी
मनं आनंदी असलं की सारंच कसं छान वाटतं नाही? पांघरूणावर उतरलेली सोनेरी किरणं, निळं आकाश, लाल-पिवळ्या फुलांवर चमकणारे दवबिंदुंचे थेंब. सकाळ एकदम प्रसन्न होती. आज खुप दिवसांनी स्वतःला निट आवरावेसे वाटत होते.. आज खुप दिवसांनी स्वतःलाच आरश्यात परत परत पहायची इच्छा होत होती. कित्ती दिवस झाले होते, मी स्वतःला निट्सं आरश्यात पाहीलचं नव्हतं. एकदा विचार आला मनात विचारावं आरश्याला, ‘आरश्या आरश्या सांग, सर्वात सुंदर कोणं?’ पण मग उगाचच वाटलं.. आरसा ‘निधी मेहता’ म्हणाला तर!!!
टुरिस्ट सिझन जवळ येत चालला आहे आणि बाजारात सहजच एक फेरफटका मारला तर त्याची जागोजागी प्रचीती येऊ लागते.
मनं नको असतानाही राजचाच विचार करत असते. कामात असुनही त्याची चाहुल लागते का हे पहाण्यासाठी मनाचा एक कोपरा सतत मग्न असतो हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे.

१७ फेब्रुवारी
आजची सकाळ माझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली. सकाळी राज ऑफीस मध्ये आला होता. म्हणाला, एक रुम ‘चेक-आऊट’ करायची आहे. म्हणलं का? तर डोळे मिचकावत म्हणाला..’निधी माझ्या रुम मध्ये शिफ्ट करत आहे’. इतके डोक सटकलं होतं ना, ती असती समोर तर कदाचीत काहीतरी नक्कीच बोलुन गेले असते, पण मग तोच म्हणाला, निधीचे २-३ गाणी रेकॉर्डींगच्या डेट्स प्रि-पोन झाल्या आहेत, तिला जावं लागते आहे. मी मात्र आहे अजुन ७-८ दिवस इथेच. इतका आनंद झाला होता ना. वाटलं उठावं आणि त्याला कडकडुन मिठी मारावी. पण तो इतक्या जवळ असुनही खुप दुर होता.
आय ट्राईड माय बेस्ट टु स्टे ए़क्स्प्रेशनलेस, पण मला माहीत आहे, माझ्या चेहऱयाने मला नक्कीच धोका दिला असणार.
गोपाळकाकांनी आज गार्डन मध्ये छान दिव्यांच्या माळा लावल्या आणि मध्ये एक छोटासा खड्डा खणुन काही लाकडं रचुन ठेवली, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी. त्याचा वापर मीच लग्गेच सुरु केला. संध्याकाळी त्या गरम-उबदार शेकोटीने बोचरी थंडी कमी केली होती. मी शेजारीच खुर्ची टाकुन बसले होते आणि अनपेक्षीतपणे राज माझ्याइथेच येउन बसला.
‘हाय..’
‘हॅल्लो..’
….
‘अचानक इकडे कशी? रेकॉर्डींग सोडुन दिलेस की काय?’
‘बस्स.. अस्सच.. काही तरी बदल’
‘हो.. पण कुणालाही नं सांगता अचानक निघुन आलीस..’
‘:-)’
‘निधी पोहोचली?’
‘हो.. मगाश्शीच फोन येऊन गेला..’
……………..
‘बदललीस तु खुप..’
‘मी?’ (ह्याला काय माहीत मी आधी कशी होते?)
‘टेंन्शन घेतेस का कश्याचे खुप?’
‘नाही रे.. काही काय?.. आय एम कुssssल, पण तुला का असं वाटलं मी बदलले..’
‘सहजच.. वजन कमी केलेस की काय?’
‘झालं.. थोडा फरक पडतोच ना..हवेचा..’
‘हम्म.. पण आता अजुन नको कमी होऊ देउस,, आहे ते छान आहे..’
‘:-)’ (मला ना.. खरं तर काय बोलायचं तेच सुचत नव्हते. मुर्खासारखे उगाच हातातल्या पुस्तकात डोकं खुपसत होते.. पण त्याने खुप बोलावं आणि आपण ऐकत रहावं अस्सं वाटत होतं)
‘केस पण काही तरी बदललेस तु!..’
‘हो.. थोडे स्ट्रेट केलेत..’ (त्याचे निरीक्षण ऐकुन मन खुप सुखावत होतं.)
……………………………………..
‘बिझी?’ (बहुतेक माझ्या पुस्तक वाचण्याला कंटाळुन म्हणाला)
‘नाही.. मी आपलं अस्संच..’ मी ओशाळुनच म्हणाले..
‘ग्रेट.. चल मला सिमला दाखव. इतके महीने इथे राहीलीस.. चल उठ..’ मला हाताला धरुन उठवत तो म्हणाला..तो स्पर्श.. एक क्षणाचा..अंगावर हजारो रोमांच उमटवुन गेला. त्याच्या त्या मजबुत हातांच्या पकडीत मी एखाद्या बाहुलीसारखी उचलले गेले.
‘थोडं थांब.. मी चेंज तरी करुन येते..’
‘छे.. चेंज कसलं करतीस.. तु इतकी क्युट असताना, कुठलाही वेगळा ड्रेस काय कामाचा..’
खुप मस्त संध्याकाळ गेली ती.. मी जाणीवपुर्वक त्याला गर्दीची ठिकाणं टाळुन लांब पॉईंट्स वर न्हेलं. नुकत्याच मावळलेल्या सुर्याच्या लाल छटा आकाशात सर्वत्र विखुरल्या होत्या. कदाचीत राजच्या सहवासाने माझ्याही चेहऱ्यावर अश्शीच लाली उमटली असेल.. मी शक्य तेवढी राजशी नजरा-नजर टाळली.

१८ फेब्रुवारी
रिसॉर्ट मध्ये आज सकाळी पुणे-मुंबईच्या १०-१२ जणांचा एक ग्रुप दाखलं झाला आज रात्रं थांबुन ते सर्व उद्या बाईक्स वरुन लेह-लडाखला जाणार आहेत. ‘वॉव, कित्ती मज्जा असेल नाही?’ मी असा विचार करतच होते आणि तेवढ्यात राजने येऊन सहजच विचारले, “इथले तसेही पाहुन झाले आहे माझे.. या ग्रुप बरोबर लेह-लडाखला जायला खुप मज्जा येईल.. जायचं? येणार माझ्याबरोबर?”
आयुष्य किती घड्याळ्याच्या दोलकाप्रमाणे हिंदकाळत असते नाही? निराशेच्या गर्तेत कोसळलेले माझे आयुष्य गेल्या काही दिवसात अचानक-पणे उत्तुंग आकाशात भरारी मारतं आहेत.
लिहीता लिहिताच पॅकींग चालु आहे, एका लाईफ़-टाईम सहलीसाठी, एका लाईफ-टाईम सहवासासाठी..

4

२१ फेब्रुवारी
लेह-लडाख, सौदर्य काय वर्णावे त्याचे? स्वच्छ निळं आकाश, निळसर हिरव्या पाण्याचे नितळ तलाव, लालसर-पिवळ्या रंगाचे उंचच उंच पर्वत आणि तश्शीच माती. बाईक्स च्या प्रवासात अंगावर उडणाऱ्या त्या पिवळसर मातीने सर्व अंग माखुन गेले होते. राज तर एक नंबरचा माकड दिसत होता.. सो क्युट..
फ्रेश होऊन आल्यावर राजने विचारले -“गेला का रंग सगळा मातीचा?”, मला तर म्हणावेसे वाटत होते की “वेड्या तो रंग तर केंव्हाच गेला, पण मनावर चढलेला तुझा रंग जातंच नाहीये”
इतक्या दुरवर बाईक वरचा असुनही प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही. खाचखळग्याच्या रस्त्यातुन, ओढ्यानाल्यातुन प्रवास करताना शरीराला होणारा राजचा निसटता स्पर्श शरीरावर प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत होता. क्षणभर जाणवलं, तुम्हाला हवा तो जोडीदार बरोबर असेल तर आयुष्यातले या ही पेक्षा मोठे खाच-खळगे कसे अनेक लोकं सहजतेने पारं करत असतील!
‘निधी मेहता’, पुर्णपणे मी तिच्याबद्दल विसरुनच गेले आहे. जणु काही ती अस्तीत्वातच नाही. जणु काही तिच आणि राजचं काही नातं आहे हेच मला ठाउक नाही. मी त्यांच्या नात्याबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ झाले होते. तिच्याबद्दल मी राजकडे एक शब्दही विचारला नव्हता आणि राजनेही तिच्याबद्दल कधी माझ्याकडे विषय काढला नव्हता. माझ्या मनामध्ये सध्या फक्त एकच गोष्ट होती.. ‘राज’
राज माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, तो मला कित्ती आवडतो, खरं तर शब्दात सांगणे अवघडच, पण शक्य असते तरीही कदाचीत ते मी इथे नक्कीच उतरवणार नाही. माझ्या मनाशिवाय ही गोष्ट कुणालाही कळु द्यायची इच्छा नाही आणि खरं तर एक भिती सुध्दा वाटते म्हणुन. सर्वांमध्ये वावरताना चेहऱ्यावर मी एक शांत, ‘कुल ऍन्ड काल्म’ असल्याचा मुखवटा घालुन वावरत असते, पण आत मधुन… प्रत्येक क्षण परीस्थीती बिघडतच चालली आहे.
२२ फेब्रुवारी
ग्रुप मधील सर्व जणं मस्तच आहेत, पण सगळ्यात इंप्रेसिव्ह, ‘करण मित्तल’, ‘मित्तल मिल्स’ चे सर्वे-सर्वा ‘कुमार मित्तल’ यांचा एकुलता एक वारस. परंतु करोडपती बाप असल्याचा किंचीतसाही अहंकार त्याच्या चेहऱ्यावर नाही. इन्ट्रोडक्शन परेड मध्ये म्हणतो कसा, ‘कुठल्याही मुलीला मी सहज पटवु शकतो..’, मला तर हसुच आलं, काय असतात ना एक एक पात्र
आज दिवसभर आरामच होता, उद्यापासुन पुन्हा पुढचा प्रवास सुरु. हवा सुरेखच आहे.
२३ फेब्रुवारी
दिवस-भर राज आज ‘निधी’ बद्दलच बोलत होता. त्यांची ओळख कशी झाली, मैत्रीचे प्रेमात रुपांतर कसे झाले हे आणि ते.. इतका वैताग आला होता मला. त्याला एवढे पणं कळत नाही का एका मुलीला दुसऱ्या मुलीची स्तुती, ते पण एखाद्या हॅंन्ड्सम कडुन.. सहसा सहन होतं नाही? मला कंटाळा आला होता त्याच्या ‘निधी’पुराणाचा.. कंटाळा? की राग? की जेलसी?? कुणास ठाऊक!
२४ फेब्रुवारी
काल रात्री हवा फारच खराब होती. आकाशातला निळसरपणा कुठेतरी निघुन गेला होता. पुर्ण आकाश करड्या रंगाने भरुन गेले होते. हवेतला बोचरेपणा अंगावर काटा आणत होता. कुठल्याही क्षणी आभाळ कोसळेल असं वाटत होतं. टेंटचा पडदा जरासा सरकवुन पाहीला तेंव्हा आकाश्यात विजा चमकत होत्या, परंतु पाऊस काही कोसळला नाही.
करडा रंग, नैराश्याचे, निरसतेचे प्रतिक. निसर्गाचे रंग आपल्या मनावर किती परीणाम करु शकतात नाही?
आज राज खुपच शांत, एकटा वाटत होता. त्याच्या मनामध्ये कसली तरी खळबळ माजली होती. कसली असावी?? निधी पासुन दुर असल्याची?, निधी ला न सांगता माझ्याबरोबर इथे आल्याची? का अजुन काही?? ठरवणं कठीण आहे.
सर्व ग्रुप मध्ये राज खुपच लोकप्रिय झाला आहे.. आणि का नाही होणार? प्रत्येक जण त्याच्या तोंडुन गाणं ऐकण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी धडपडत असतो. वाटतं जावं आणि राजचा हात हातामध्ये घेऊन ‘राज फक्त माझा आहे’ असं ओरडुन सांगावं. पण दुसऱ्या क्षणाला वाटतं, खरंच राज आहे माझा? जितक्या त्वेषाने माझे मन राजसाठी आक्रंदत आहे त्याच्या एक टक्का तरी माझा राजवर हक्क आहे?
मनामध्ये राज बरोबरचा हा सहवास क्षणभंगुर आहे आणि काही दिवसांनी राज परत आपल्यापासुन दुर (?) जाणार आहे ह्याची खंत/टोचणी लागुन आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर मिळणारा प्रत्येक क्षण मला जगायचा आहे.
२५ फेब्रुवारी
सुरेख वातावरणाने मनावर आलेली मरगळं कुठल्या कुठे निघुन गेली होती. आज माहीतेय मी पहिल्यांदा बाईक चालवली. रस्ता चांगला होता आणि राज मागेच लागला ‘चालव, चालव’ म्हणुन. शंभरवेळा गेअर बदलताना बाईक बंद पडली पण शेवटी जमवली कशी तरी. खुप मज्जा आली. इतकी हसले आहे मी आज.
संध्याकाळी सर्व जण उबदार शेकोटी भोवती गप्पा मारत बसलेले असताना मला राहुन राहुन असं वाटत होतं की राज माझ्याकडे बघतो आहे, परंतु माझी त्याच्याकडे बघायची हिम्मतच नाही झाली. आणि हे एकदा नाही तर दोन-तिनदा मला जाणवलं, एकदा तर माझी आणि त्याची नजरानजर सुध्दा झाली होती. मला खात्री आहे की राज अधुन-मधुन माझ्याकडे बघत असतो.. नक्कीच.. “आय नो, इट्स नॉट माय इमाजीनेशन”
मला असं का वाट
२६ फेब्रुवारी
काल डायरी लिहीताना मी इतकी गुंग होऊन गेले होते आणि अचानक माझ्यामागे कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली म्हणुन मागे वळुन पाहीलं तेंव्हा राज उभा होता. तिच नेहमीची स्टाईल, निळ्या वॉश्ड रंगाचे जर्किन, त्यातुन डोकावणारा व्हॅनीला-व्हाईट रंगाचा शर्ट, एक कॉलर किंचीतशी वर गेलेली, खिश्यामध्ये हात आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य. त्याला बघताच मी डायरी खाडकन बंद केली. ‘मुर्ख आहेस का तु?’ स्वतःलाच जोरात ओरडले मी मनाशीच. इतकी घाबरले मी त्याला बघताच. ‘आय जस्ट होप की त्याने काही वाचले नसावे’. कधी कधी कुठल्या तंद्रीत असते मी मलाच कळत नाही.
सकाळी ग्रुप मधली एक जण विचारत होती, ‘बोथ ऑफ यु टुगेदर? कपल?’ आणि मी कसनुस हसुन उत्तर दिलं.. ‘नो.. जस्ट गुड फ्रेंड्स’
काल अर्धवट सोडलेली डायरी पुढे लिहीन म्हणलं.. पण काय लिहीत होते तेच लक्षात येईना.
असो, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ आधीकच वाढवत
आहे. हातातुन निसटुन गेलेला प्रत्येक क्षण मनाला तो लवकरच दुर होणार आहे ह्या विचाराने अनंत यातना देत आहे. मला लवकरात लवकर काही तरी केले पाहीजे.. पण काय? नशीबाने राजला पुन्हा एकदा माझ्यासमोर आणुन उभे केले आहे यावेळेला मी काही केले नाही तर.. तर कदाचीत, कदाचीत?? मलाच माहीत नाही तर काय होईल.
मी वेडी होईन? ती तर मी आधीच झाले आहे!, मग कदाचीत मरुन जाईन?? पण छे.. असं कुणाच्या आठवणीने कुणी कधी मरतं का? काय होईल माझं मलाचं माहीत नाही, पण जे होईल ते नक्कीच चांगलं नसेल.
मी ठरवलं आहे. मी एकदा तरी प्रयत्न करीन. राजला ह्याची पुसटशी का होईना जाणीव करुन देइन की तो मला आवडत होता आणि अजुनही तितकाच आवडतो.
“टु लेट समवन नो यु लव्ह हिम इज टु टेल हिम”, वाक्य साधं सोपं.. पण जमेल मला ते?? कदाचीत येणारा काळच ठरवेल..
[क्रमशः]


User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: मेहंदीच्या पानावर

Post by rangila »

5
२७ फेब्रुवारी
आज मी जास्ती काही लिहीणार नाही, लिहुच शकत नाही. आजची संध्याकाळ मनावर कायमचीच कोरली गेली आहे, पण ती कागदावर उतरवली तर कदाचीत.. कदाचीत, पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल म्हणुन त्या धुंदीतच डायरी पुढे ओढली.
कॅंम्पचा उद्या शेवटचा दिवस. आजचा बेस कॅंम्प पॅंगॉंग लेक पाशी होता. सर्व जणं निशब्द होते. अवर्णनीय. प्रत्येकजण आपल्याच विश्वात हरवला होता. राज आणि मी आम्ही दोघंही तळ्यात पाय सोडुन बसलो होतो. राजच्या हाताला जाणुन बुजुन स्पर्श करायचा, मी ठरवलेच होते. ह्रुदय खुप धडधडत होते. त्या शांततेत धडकण्याचा आवाज राजला ऐकु जाईल की काय अशी उगाचच भिती वाटत होती. हाताची बोटं उघड बंद होत होती, त्या थंड वातावरणातही कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. छातीवर प्रचंड ओझं जाणवत होते. शेवटी घट्ट डोळे मिटुन घेतले आणि हळुवारपणे हात त्याच्या हातावर ठेवला. माझ्या अचानक स्पर्शाने त्याचे दचकणे माझ्या हाताला जाणवले होते पण त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव बघायची मला हिम्मत होत नव्हती. मी अजुनही डोळे गच्च बंद करुन बसले होते.
माझा हात त्याच्या हातावरच होता, काही क्षण आणि नंतर त्याच्या मजबुत, तरीही हळुवार पकडीमध्ये तो समावुन गेला. मी डोळे बंद करुन ते क्षण अनुभवत होते. तो अनुभव खराच होता का? का तो केवळ मनाचा एक खेळ होता? स्वतःचे केलेले एक सांत्वन होते? मला माहीत नाही. आणि माहीत करुन घ्यायची इच्छाही नव्हती. त्या स्वप्नील सुखात मला आकंठ बुडुन जायचे होते आणि मी तेच केले होते.
थंडगार वाऱ्याने अंगावर रोमांच उभे केले होते. ह्रदयाची अजुनही धडधड चालुच होती. हा अनुभव खराच आहे का? माझा तेंव्हाही विश्वास बसला नव्हता आणि अजुनही बसत नाहीये.
कुणाच्यातरी गाडीच्या आवाजाने माझी स्वर्गीय तंद्री भंगली. मी त्याच्याकडे न बघताच माघारी वळले.

२८ फेब्रुवारी
आजचा शेवटचा दिवस. आम्ही एकत्र असलो तरी शक्यतो एक-मेकांपासुन दुर रहाण्याचाच प्रयत्न करत होतो. का? कश्यासाठी?
आज त्याचा आणि माझा एकमेकांना फारसा असा स्पर्श झालाच नाही, मला अगदी हवा-हवासा
वाटत होता आणि त्याच्या डोळ्यात बघुन मी खात्रीने सांगु शकते की त्यालाही.. पण तो
स्वतःला प्रयत्नपुर्वक माझ्यापासुन लांब ठेवु पहात होता. असो, आम्ही गप्पा मात्र खुप मारल्या. राज सतत काही तरी माझ्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होता.. आणि कदाचीत नकळत मी सुध्दा.
दुपारचं जेवण आम्ही एकत्रच घेतलं, म्हणजे तसं एकत्रच जेवतो, पण सर्व जण इतके राजच्या आजु-बाजुला असतात की तो माझ्या समोर असुनही माझा नसतो. आज मात्र आम्ही जरा वेगळे होऊनच जेवलो. अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्याच्या तलावात पाय बुडवुन जेवताना खुप मजा आली. खरं तर जेवणं कसले ते जे मिळेल ते पोटात ढकलणे. तिथला मेनु बघुन राजने स्वतःसाठी काहीच घेतले नव्हते. खरं तर नंतर मला ही असंच वाटलं की मला भुकच नाहीये.
काही मिनीटांमध्येच सिमल्याकडे परतीचा प्रवास सुरु.

२ मार्च
मागचा पुर्ण आठवडा मी माझी राहीलेच नव्हते. राज सोडला तर माझं कुठल्याही गोष्टींत लक्ष लागत नव्हतं. माझ्या अनुपस्थीतीत गोपाळकाकांच्या रिसॉर्टमधली अनेक कामं खोळंबली होती, पण कश्यालाही हातं लावायचा मला प्रचंड कंटाळा आला होता.
राज कालच रात्री परत गेला. जाताना म्हणाला, ‘तु ये परत, स्टुडीओ तुझी वाट पहात आहे, सगळ्यांना तु परत हवी आहेस’ त्यानंतर बराच वेळ विचार करुन नं बोलताच गेला. त्याला कदाचीत असं तर म्हणायचं नव्हतं .. ‘आणि कदाचीत मलाही..!!!!!’
त्याच्या जाण्याने एक फार मोठ्ठी पोकळी निर्माण झाली आहे. छातीवर उगाचच दडपण आल्यासारखे वाटते आहे. अस्वस्थता काहीच करुन देत नाही. सतत मनामध्ये कसलातरी विचार चालु आहे. आता इथे जास्त दिवस रहाणं खरंच शक्य नाही. परत जायलाच पाहीजे, माझ्यासाठी? राजसाठी?? की माझ्या राजसाठी???

३ मार्च
गोपाळकाकांना सांगणं अवघडं वाटलं होतं, पण त्यांनी समजुतीने घेतले. परत जाण्याचे शेवटी आज नक्की झाले. चार दिवसांत मी पुन्हा राजच्या समोर असेन. कसा असेल तो? मला बघुन त्याला आनंद होईल? का परत गेल्यावर निधीमध्ये पुन्हा गुंफुन गेला असेल? मला विसरला तर नसेल?
नाही, नक्कीच नाही. तो फक्त माझाच आहे.
राज, मी येतेय….मी परत येतेय

८ मार्च
लेह-लडाखचा तो आठवडा खुप्पच छान होता, खुप म्हणजे खुप्पच छान. अजुनही मला वाटते की ते क्षणं खरंच होते का? का ते एक स्वप्न होतं? मुख्यतः ते शेवटचे दोन दिवस! राजच्या मनात खरंच माझ्याबद्दल काही असेल का? आणि असेल तरी आता अजुनही त्याला तस्सेच वाटत असेल का? का त्याने त्याचा विचार परत बदलला असेल?
कित्ती आनंद झाला सगळ्यांना मी परत आले आहे हे बघुन! आणि मला? खरंच मलाही खुप आनंद झाला सगळ्यांना भेटुन!
आशु आणि मॅंडी इतक्या खुश झाल्या होत्या, त्यांचा विश्वासच बसत नव्हता की मी खरंच परत आले आहे. बाहेरच्या कॉरीडॉअर मध्ये आमच्या तिघींची नुसती चपड-चपड चालु होती आणि त्याचवेळेस मला राज-निधी बरोबर येताना दिसला. मला पाहील्यावर त्याच्या डोळ्यात आलेली एक चमक.. मी पाहीली. एक क्षण वाटले तो धावत येऊन भेटेल मला, पण निधी बरोबर असल्याने तो निघुन गेला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले ते नाजुकसे हास्य मी टिपले होतेच पण ते आशु आणि मॅडीच्या नजरेतुनही सुटले नाही.
त्याच्या त्या एका हास्याने मनाला खुपच उभारी मिळाली. कदाचीत आम्ही दोघं एकत्र आहोत. तो दिसेनासा होईपर्यंत माझी नजर त्याच्यावरच खिळली होती आणि जेंव्हा मी परत आशु आणि मॅंडीकडे पाहीले तेंव्हा दोघीही भुवया उंचावुन माझ्याकडेच बघत होत्या.

१० मार्च
राज अधुन मधुन मला दिसतो स्टुडीओ मध्ये. पण आम्ही अजुनही एकमेकांशी बोललो नाही. एक चोरटी छोटी स्माईल सोडली तर आमच्या दोघांच्यात असं अजुन काहीच घडलं नाही आणि खरं सांगायचे तर मला त्याची फारच चिंता वाटत आहे. असं वाटतं की अजुनही तो कुठल्यातरी गोष्टीवरुन गोंधळला आहे. कदाचीत ‘मी ‘ की ‘निधी’? मी जितकी त्याला बघुन आनंदी आहे, खरं सांगु तो एवढा आनंदी अजुन तरी मला नाही वाटला.
आशु आणि मॅन्डीला मी अजुनही राजबद्दल काही सांगीतले नाहीये. पण आमची नजरानजर त्यांच्या नजरेतुन सुटलेली नाही हे नक्की. त्यांच्या चेहऱ्यावर असणारे प्रश्न मला आज नाही तर उद्या सोडवावे लागणार आहेत. उलट आता असं वाटतंय की स्वतःहुन सांगीतले तर कदाचीत मला त्यांची मदतच होईल
शेवटी त्यांना उद्या संध्याकाळी घरी बोलावले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर फारसे आश्चर्य उमटलेले मला दिसले नाही. कदाचीत मला वाटते त्यांना माहीती आहे, का?

११ मार्च
संध्याकाळी येताना मॅंडी ‘चायनीज चॉप्सि आणी ग्रेव्ही मंचुरीयन’ घेउन आली. आशुने सर्वांचे प्रचंड आवडते ‘ऍप्पल ऍपी’ आणले तर मी घरीच ‘लेमन राइस’ बनवला होता. इतक्या दिवसांनंतर चे ते तिघींनी घेतलेले जेवण म्हणजे एक अनमोल क्षण होते.
जेवणानंतर तिघींसाठी गरमा-गरम नेस-कॅफे बनवली आणि आम्ही तिघीही व्हरांड्यात खुर्चा टाकुन बसलो. दोघींच्या चेहऱ्यावर मला अजुनही प्रश्न चिन्ह दिसत होते. शेवटी मी बोलायला सुरुवात केली आणि पुढचे ३ तास मीच बडबडत होते आणि दोघीही ऐकत होत्या. उत्सुकता, आनंद, चिंता अश्या निरनिराळ्या भावनांचे पडसाद दोघींच्याही चेहऱ्यावर उमटत होते.
‘मग’ मधील कॉफी केंव्हाच संपली होती. शेवटी मी च उठले आणि परत कॉफी बनवुन आणली. दोन घोट घेतल्यावर शेवटी दोघींना विचारले, ‘काय वाटते तुम्हाला? मी काय करायला हवे?’ आणि दोघीही एकदमच म्हणाल्या, ‘हा काय प्रश्न झाला?’ राज आणि निधी कध्धीच एकमेकांना अनुरुप वाटत नाहित. राजला पहिल्यापासुनच तु आपलं मानलं आहेस आणि तो तुझाच झाला पाहिजे, आणि त्यासाठी तुला लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत.’
खुप बरं वाटलं त्यांच बोलणं ऐकुन, ‘सच्ची’ मैत्री यालाच म्हणतात, नाही का?

[क्रमशः]


User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: मेहंदीच्या पानावर

Post by rangila »

6
१२ मार्च
कालची संध्याकाळ मनावरचे खुप मोठ्ठे ओझे उतरवुन गेली. निदान माझ्या मनात मला बोचत असलेली अपराधीपणाची भावना तरी कमी झाली. मी जे करते आहे, जे करणार आहे, ते अगदीच काही चुकीचे नाही ही जाणीवच माझ्यासाठी खुप आहे.राजला ‘पटवण्याच्या’ प्रयत्नात मदतीला माझ्याबरोबर माझ्या दोन जिवाभावाच्या मैत्रीणीसुध्दा आहेत.
मला माझ्या भावना राजपर्यंत पोहोचवायला हव्यात. पण कधी? कसं? राज एकटा असा कध्धीच सापडत नाही. एक तर त्याचे फॅन्स नाही तर ती निधी. सारखं कोण ना कोणीतरी त्याच्या अवतीभोवती असतेच.
काय करता येईल की निधीपासुन राज काही क्षणांसाठी वेगळा असेल?
विचार करता करताच डोक्यात एक कल्पना आली.. ‘फॅन्स..’, स्तुती.. निधी जाम वेडी आहे असल्या गोष्टींमध्ये. कसेही करुन जर आशु आणी मॅन्डीने निधीला बोलण्यात गुंतवुन ठेवले..
मला जरी निदान राजशी दोन मिनीटं बोलायला मिळाली तरी निदान त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे याचा अंदाज बांधता येईल.
१३ मार्च
हा हा हा… अजुनही हसु येतेय मला. आशु ग्रेट आहे, खरंच!! काय मस्त गुंगवुन ठेवले तिने निधीला. ‘निधीजी तुमची गाणी अशी आहेत..’, ‘निधीजी तुमचा आवाज म्हणजे ना..’, ‘निधीजी असं, निधीजी तस्स.. ’काय पकडलं होतं तिला आज स्टुडीओ मध्ये. आणि मी? मी आतुतरतेने ’त्या’ क्षणाची वाट बघत होते. आशुने मला हळुच खुण केली आणि मी अगदी सहजच राजच्या इथे गेले.
खरं तर खुप गोंधळल्यासारखे झाले होते मला त्याच्या समोर. मनाची खुप घालमेल झाली. एकदा वाटलं, वळुन पळुन जावं परत, कुठंही न बघता. पण मोठ्या मुश्कीलीने हिम्मत गोळा केली होती.
‘राज, मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचं आहे, शक्य असेल तर प्लिज मला या नंबरवर फोन कर’ असं म्हणुन घाई-घाईतच माझा फोन नंबर लिहीलेला कागद त्याच्या हातात कोंबला आणि तेथुन निघुन गेले.
त्याची प्रश्नार्थक नजर माझ्यावर रोखलेली मला जाणवले होते, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तो मला नक्की फोन करेल. त्याने फोन नाही केला तर… तर माझे उत्तर मला मिळालेच नाही का?
… पण करेल.. राज नक्की फोन करेल. मी ‘माझ्या’ राजला चांगले ओळखते.
१५ मार्च
दोन दिवस होऊन गेले, राजचा फोन नाही. मी काय बोलले ते कळाले ना राजला? मी कागद बरोबर दिला ना त्याला? काय गडबडीत, वेंधळेपणाने दुसरेच काही हातात कोंबले त्याच्या फोनच्या प्रत्येक रिंगने वाढलेली उत्सुकता आणि ‘तो’ फोन राजचा नाही हे पाहुन चेहऱ्यावर पसरलेली नाराजी मी नाही लपवु शकत. दिवस-रात्र मी मोबाईलला कवटाळुनच आहे, जणु काही तो नाहीसा झाला तर माझं आयुष्यच संपुन जाईल.
स्टुडीओमध्ये नजर सतत राजलाच शोधत असते. पण तो दिसलाच नाही. मी विचीत्र तर नाही ना वागले? आमच्या मैत्रिचा मी चुकीचा तर नाही ना अर्थ काढला? माझ्या मुर्खपणामुळे थोडेफार का होईना जवळ आलेला राज माझ्यापासुन दुरावणार तर नाही ना??
….. कायमचा??
१७ मार्च
’कित्ती सोप्प असतं गं म्हणणं जाऊ देत ना’ असं अगती आगतीकतेने म्हणाले होते मी आशुला. माझी तर खात्रीच पटत चालली होती की, खरंच मुर्खपणाच केला मी. निदान मित्र म्हणुन का होईना राज माझ्या जवळ होता. माझ्या मनाने मला पुर्णपणे धोका दिलेला होता. साफ चुक होता माझा विचार, माझ्या भावना. राजचा फोन तर सोडाच पण गेले ४ दिवस तो दिसला पण नव्हता आणि मी पुन्हा एकदा
घरात खुप सारा पसारा झाला होता. कुठलीही गोष्ट आवरुन ठेवण्याचा विचारच करत नव्हता. आय-ब्रोज करायची वेळ उलटुन गेलेली होती. आरश्यासमोरही जायला भिती वाटत होती. न जाणो चुकुन समोर एखादं अस्वलच दिसायचे :-।
गेले ४ दिवस मी माझी राहीलेलेच नव्हते. कुठल्याही गोष्टीवर निटपणे विचार करणे केवळ अशक्य झाले होते. डोक्यात इतक्या गोष्टी होत्या विचार करायला की कश्यावर आणि काय विचार करावा ह्यावर विचार करायला सुध्दा विचार करण्याचा विचार मला करवत नव्हता.
काय लिहीते आहे मी.. वेड लागलं आहे मला खरंच.
२१ मार्च
’पटकन आवरुन तयार रहा, मॅन्डी येते आहे तुला पिक-अप करायला’ आशु फोनवर जणु किंचाळतच होती.
’अग पण कश्याला? कुठे जायचे आहे? मी नाही येणार कुठे, कंटाळा आला आहे मला’, मी उडत उडतच उत्तर दिले होते पण त्याआधीच आशुने फोन ठेवुन दिला होता
मी उपकार केल्यासारखेच आवरुन ठेवले. एखाद्या वादळासारखीच मॅन्डी आतमध्ये घुसली आणि मला जवळ जवळ ओढतच घराबाहेर काढले. आणि मी? एखाद्या वाळक्या पानासारखी तिच्यामागे फरफटत गेले होते आणि गाडीत जाऊन बसले.
मॅन्डीने गाडी थांबवली तेंव्हा भानावर आले. स्टुडीओच्याबाहेर आम्ही उभं होतो आणि मॅन्डी मला बोट दाखवुन काही तरी दाखवत होती. तिच्या बोटाकडुन त्या दिशेकडे माझी नजर गेली. दुरवर एक अंधुक आकृती मला दिसत होती… राज? छे.. क्षणभर वाटलं, मला दुसरं काही सुचतच नाही. पण नाही, तो राजच होता… आशुशी काही तरी बोलत होता.
मॅन्डी मला हाताला धरुन त्या दिशेने गेली, राजच्या बऱ्ायाच जवळ गेल्यावर म्हणाली, ’आsssशु.. आम्ही कॅन्टीनमध्ये जात आहोत’
राजने मागे वळुन पाहीले. त्याच्या चेहर्यारवर गोड हास्य होते आणि मी मात्र तेरा दिवसांचे सुतक पाळुन आल्यासारखी विस्कटलेली होते. मी तशीच मॅन्डीच्या मागे मागे कॅन्टीनमध्ये गेले. मला काय चालु आहे, काहीच्च कळतं नव्हते. मी कॅन्टीनमध्ये बसे पर्यंत मॅन्डीने कॉफी मागवली होती. मॅन्डी सारखी मागे वळुन वळुन बघत होती. कश्यासाठी? ह्याचे उत्तर मला काही क्षणातच मिळाले, कारण आशु राजला घेउन आमच्याच दिशेने येत होती.
राज येताच मॅन्डी उठुन उभी राहीली आणि त्याला ग्रीट केले, मी मात्र अजुनही मठ्ठासारखी बसुन राहीले होते. काय चालले आहे, खरंच काही कळत नव्हते मला.
राज खुर्ची ओढुन माझ्याशेजारीच बसला आणि इकडे तिकडे बघुन म्हणाला, ’हे सॉरी यार, थोडं कामासाठी बाहेर गावी गेलो होतो, जमलंच नाही बघ फोन करायला. आज आहे वेळ संध्याकाळी?
मॅन्डीने मला हाताने ढोसले तेंव्हा राज पुन्हा तेच विचारत होता. शेवटी मॅन्डीच म्हणाली, “हो आहे ती संध्याकाळी”
’गुड.. मग आपण..’कॅफे रियाटो’ मध्ये भेटुयात? ८.३० ला? थोडं लांब आहे, पण गर्दी कमी असते.’ राज माझ्याकडे बघत विचारत होता.
’चालेल’ मॅन्डीने माझ्यावतीने सांगुन टाकले होते. राज लगेच निघुन पण गेला. पण मी अजुनही तश्शीच उध्वस्त बसले होते.
’एssss बधीर.. आशुने गदागदा हलवले, अगं काय हे? तो तुला विचारतो आहे आणि तु काय अशी ढीम्म?’
कॅलीडोस्कोप कसा असतो ना? क्षणाक्षणाला आकार वेगळे, रंग वेगळा त्याचा अर्थ वेगळा. माझं आयुष्य तस्संच झालं आहे. आत्ता डायरी लिहीताना सगळ्या गोष्टी निट डोळ्यासमोर आल्या आणि आज संध्याकाळी राजला भेटायचं आहे ह्याची जाणीव झाली.
पुन्हा एकदा नविन आशा. एकदा वाटतं होतं जाऊच नये. निदान अपेक्षाभंगाचे दुःख तरी होणार नाही, मग वाटलं. राज वर खुप चिडावं, ओरडावं, मारावं आणि त्याला जवळ ओढुन घट्ट मिठीमध्ये समावुन घ्यावं. घड्याळाचा काटा पुढे पुढे चालला आहे आणि मला आवरायला खुप वेळ लागणार आहे.. खुsssप वेळ.. मला आज सर्वात सुंदर दिसायचं आहे, निधीपेक्षाही सुंदर. मी राजला अनुरुप दिसले पाहीजे, वाटले पाहीजे, राजची गर्लफ्रेंड असावी तर अश्शी.. बायको असावी तर अश्शीच.. नकळत लाजुन तळहाताने चेहरा झाकुन घेतला होता.
मन तर केंव्हाच कॅफे मध्ये पोहोचले होते, शरीराने तिथे पोहोचायला फक्त तिन तास उरले होते.. फक्त तिन तास..
[क्रमशः]


Post Reply